भास्कर मेहरे, प्रतिनिधी
कळंब, 24 डिसेंबर : यवतमाळ येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या क्रुझरला ट्रकने धडक दिल्याने 9 जण जागीच ठार झाले असून, सहा जण जखमी झाले आहे. यवतमाळ-नागपूर मार्गावरील चापर्डा इथं आज सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
कळंब तालुक्यातील पार्डी सुकळी येथील नितीन स्थुल यांचं यवतमाळ येथील वाघापूर येथील कांबळे यांच्याकडे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रम आटोपून आज सोमवारी रात्री आपल्या गावाकडे एम.एच. 29 आर 7159 क्रमांकाच्या क्रुझरने परत जात होते. नागपूरकडून यवतमाळकडे जाणाऱ्या एम.एच. 40-3288 क्रमांकाच्या ट्रकने क्रुझरला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, क्रुझरमधील 9 जण जागीच ठार झाले असून, सहा जण जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर, वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालय आणि यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या घटनेने पार्डी सुकळी गावावर शोककळा पसरली आहे.
================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.