जालना, 27 जानेवारी : एखाद्या सिनेमाला शोभावी अशी अपहरण आणि सुटकेची थरारक घटना जालन्यात (jalana) घडली आहे. दोन कोटीच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्यांचे अपहरण (Kidnapping) केले. त्यानंतर हातपाय-डोळे बांधून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर अंबड तालुक्यातील सौंदलगाव फाटयाजवळ राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिले. सुदैवाने या घटनेत व्यापाऱ्याचे प्राण वाचले आहे. पण अपहरण करणाऱ्यांचा ठावठिकाणा लागू शकला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील मादलमोही येथील व्यापारी कैलास आसाराम शिंगटे (वय ४०) यांचा पोकलँड, जेसीबी तसंच टायरच्या शोरुमचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारच्या ३ वाजेच्या सुमारास काही लोकांनी गेवराई तालुक्यातील साठेवाडी येथे शेततळे खोदयाचे आहे. त्यासाठी आम्हाला पोकलँड लागते. तेव्हा तुम्ही शेतात पाहणीसाठी या असे म्हणून त्यांनी शिंगटे यांना बोलावले.
तेव्हा शिंगटे हे साठेवाडी गावाकडे दुचाकीवर जात असताना गावाजवळील सावखेडा गावाजवळून जात होते तेव्हा अज्ञात काही लोकांनी स्कॉर्पिओ गाडीने शिंगटे यांच्या गाडीला धक्का दिला. शिंगटे यांना धक्का बसताच ते खाली पडले. तेव्हा खंडणी बहाद्दराने गाडीत बसून त्यांचे हातपाय बांधले. त्यांच्या डोळयाला पट्टी बांधून तोंडात बोळा कोंबला. तेव्हा खंडणी बहाद्दरांनी '२ कोटी दे' असे म्हणून दाभनाने त्यांच्या नखात व पायावर वार करून बेदम मारहाण केली.
(तरुणीचं अपहरण करत सामूहिक बलात्कार, नंतर दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये पीडितेची धिंड)
खंडणीखोरांनी शिंगटे यांना चुर्मापुरीमार्गे वडीगोद्रीकडे डाव्या कालव्यावरुन घेऊन जात असतानाच अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाजवळ एक स्कॉर्पिओ गाडीचे डिझेल संपल्याने बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी सुरू न झाल्याने तेथेच डाव्या कालव्यामध्ये ढकलून दिली. परंतु, अपहरण झालेल्या व्यापारी शिंगटेच्या खिशातील आधारकार्ड,पॅनकार्ड व इतर कागदपत्रे जागेवर टाकून दिले.
तसंच स्कॉर्पिओ गाडीची नंबर पाटीही तोडून बाजूला टाकून दिली. जेणेकरून तपास तेथेच घुटमळवा. त्यानंतर शिंगटे यांना खंडणीखोरांनी दुसऱ्या स्कॉर्पिओमध्ये घालून औरंगाबाद-बिड राष्ट्रीय महामार्गावरून औरंगाबादकडे घेऊन निघाले.
खंडणीखोरांनी हे शिंगटे यांना औरंगाबादकडे नेत असताना अंबड तालुक्यातील सौंदलगाव खुर्द पाटीजवळ गाडीतूनच फेकून दिले. तेव्हा शिंगटे हे एका हॉटेलवर चालत आले. तिथे बांधलेले हातपाय सोडण्यात आल्यानंतर त्यांनी हॉटेल चालकाच्या मोबाईलवरून जवळच्या मित्राला फोन केला. तसंच मित्राला जागेचा पत्ता व घडलेली सर्व हकीकत सांगितली. हे सर्व सांगितल्यानंतर कळलं की कॅनलमध्ये सोडलेल्या स्कार्पिओ गाडीत शिंगटे नाही.
(श्रेयस अय्यरची जागा घेण्यासाठी दोन खेळाडू तयार, काही क्षणात पलटवतात मॅच!)
त्यानंतर शिंगटे यांच्यावर वडीगोद्री येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. तेव्हा गोंदी पोलिसांनी शिंगटे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात सविस्तर विचारपूस केली. तेव्हा शिंगटे यांनी अपहरण केलेले कोण लोक आहेत त्यांना ओळखत नाही. कारण त्यांनी तोंड पुर्णपणे झाकलेली होती. ते हिंदी भाषेत संभाषण करून 2 कोटींची मागणी करत होते. आठ दिवसापूर्वी माझा एक प्लॉट हा ३५ लाखाला विकला होता. त्याची माहिती अपहरणकर्त्यांना कदाचित माहिती असेल म्हणूनच त्यांनी माझे अपहरण केल्याचे शिंगटे यांचे म्हणणे असल्याचे गोंदी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिंगटे यांची दुचाकी ही रस्त्यावर पडल्याची पाहून काहीतरी घटना झाली असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी चकलंबा येथील पोलीस ठाण्यात प्रथम माहिती दिली होती.त्यांच्या तपास सुरू असताना अंतरवाली सराटी कॅनलवरुन येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना कॅनलमध्ये गाडी दिसताच त्यांनी गोंदी पोलीस ठाण्यात माहिती दिली. तेव्हा गोंदी पोलीस यांनी घटनास्थळी येवून तपास सुरू केला.
हा तपास सुरू असताना शिंगटे यांनी मित्राला फोन केल्यामुळे सर्व घटनेचा उलगडा झाला. खंडणीसाठी अपहरण केले असताना खंडणी वसुली न करता अधिक काही बरे वाईट केले नाही.तसेच त्यांना रस्त्यावर का फेकून दिले. असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने घटनेची गुंतागुंती अजूनही सुटलेली नाही.गोंदी पोलिसांनी हा गुन्हा गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात वर्ग केल्या असल्याचे सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.