मुंबई, 11 एप्रिल : महाराष्ट्रासाठी कोरोनाची दुसरी लाट (Maharashtra Coronavirus Second Wave) ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक भयंकर ठरली आहे. कारण दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्था तोकडी पडत असून रुग्णालयांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन अशा गोष्टींची कमतरता भासत असल्याचं चित्र राज्यभरात निर्माण होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा (Strict Lockdown) विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर याबाबत थेट संकेत दिले आहेत.
लॉकडाऊन केल्यास हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे मोठे हाल होतात, याची प्रचिती मागील वर्षीच संपूर्ण देशाला आली. तसंच अचानक लॉकडाऊन केल्यामुळे शहरात उदरनिर्वाहासाठी आलेले नागरिक अडकून पडतात. रोजगार गेल्यानंतर शहरात थांबून करणार काय आणि उदरनिर्वाहासाठी पैसे आणणार कुठून, असा प्रश्न या कामगारांसमोर उभा ठाकतो. त्यामुळे मग हे कामगार मिळेल त्या साधनाने आपल्या मूळ गावी जाण्याची धरपड करतात. कष्टकऱ्यांचे असे हाल होऊ नयेत, यासाठी लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेऊ नये, अशी मागणी विविध स्तरातून समोर येत आहे.
हेही वाचा - "संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचं", संजय राऊतांचा पुन्हा धमाका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आज त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास मुख्यमंत्री लोकांना शहरातून गावाला जाण्यासाठी मुभा देणार का, हे पाहावं लागेल.
लॉकडाऊनबाबत नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown