उस्मानाबाद, 06 मार्च : 'राज्यपाल यांनी काही भाषण केलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली.
आज शरद पवार यांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी गावातील विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल आहे. पण त्यांनी दोन कार्यक्रमात वक्तव्य केलं. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य नसल्याने त्यांच्याकडून अशी विधानं होतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी कोश्यारी यांच्यावर नाव न घेता टीका केली.
राज्यपालांनी अशी वक्तव्यं केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे, लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे' असा टोलाही पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.
तसंच, 'काही लोकांना सत्ता गेल्यापासून करमत नाही निवडणूक निकाल लागण्याआधीच मी येणार मी येणार, असे सांगत होते पण त्यांना आम्ही काय येऊ देतो, अशी मिस्कील टीका पवार यांनी हातवारे करत विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केली.
'राज्यातील आघाडी सरकार हे देशातील इतर राज्यांपेक्षा चांगले काम करत आहे, असं कौतुकही पवारांनी महाविकास आघाडी सरकारचं केलं.
तर 'नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक यश राष्ट्रवादीला मिळाले आहे. तरी देखील भाजपचा माज काही केल्या उतरत नाही. भल्या भल्याच्या वर ईडीच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप करत ईडीची किंमत शेतकऱ्याच्या बिडी सारखी झाल्याची टीका केली आहे, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.