मुंबई, 16 ऑक्टोबर : यंदा मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती, तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थोरात पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील असंही थोरात म्हणाले.
दरम्यान, राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची स्थिती आणखीनच बिकट झाली. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येत्या काही दिवसांत राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देतात का, हे पाहावं लागेल.