अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 3 फेब्रुवारी : सध्या संपूर्ण देशभर वंदे भारत एक्स्प्रेसची चर्चा सुरू आहे. ही एक्स्प्रेस धावण्यासाठी आवश्यक रेल्वे ट्रॅक बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. साधारणपणे सात दिवसांमध्ये एका वंदे भारत ट्रेनची चाचणी पूर्ण करण्यात येते. तसंच दोन ते तीन दिवसांमध्ये एक ट्रेन तयार होत आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही रेल्वे तयार करण्याचं काम महाराष्ट्रातही करण्यात येणार आहे.
कुठं होणार काम?
सोनीपत, रायबरेलीसह महाराष्ट्रातील लातूरमध्येही वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्याचं काम होणार आहे. केंद्रीय रेल्वे विभागाच्यावतीनं ही घोषणा करण्यात आलीय. याबाबतचे प्रोडक्शन आणि डिझाईन संपूर्णपणे रेडी आहे. लातूर जिल्ह्यातील रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये हे काम करण्यात येणार असल्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. अनेक मराठी तरुणांना या निमित्तानं रोजगार मिळणार असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे.
Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर मार्गावरील 'वंदे भारत'ला मोठा अडथळा
'वंदे भारत' मध्ये कवच' तंत्रज्ञान (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) आहे. ही एक स्वयंचलित सुरक्षा प्रणाली असून ही प्रणाली दोन गाड्यांची टक्कर होण्यापासून रोखते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलं असून परदेशातून आयात होणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत कमी खर्चात बनवलं जातं.
मुंबई ते गांधीनगर ही वंदेभारत ट्रेन महाराष्ट्रातून सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई ते सोलापूर "वंदे भारत' ट्रेन देखील लवकरच सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटल्यानंतर ही ट्रेन दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डूवाडी आणि सोलापूर या ठिकाणी थांबेल. आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे.
वंदे भारतच्या तिकीटाबद्दलची माहिती अजून जाहीर झालेली नाही. रेल्वे विभागाच्या तांत्रिक अडचणीचा विचार करून ही गाडी सुरू करण्याच्या तारखेत एखादा दिवस मागे-पुढे होऊ शकतो. याबाबत वरिष्ठांकडून अधिकृत पत्रक आले की जाहीर करू अशी माहिती सोलापूर येथील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.