रत्नागिरी, 1 मार्च : नाणार रिफायनरीची अधिसूचना रद्द होऊनही ‘सामना’त रिफायनरीची जाहिरात छापून आल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी नाणार परिसरात शिवसेनेने सभा घेतली. शिवसेना आणि कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना यांनी संयुक्तपणे सभा घेतली होती. या सभेला रिफायनरी विरोधी संघटनांचे प्रतिनिधीही हजर होते.
नाणार रिफायनरी रद्द होऊन विधानसभा निवडणुका पार पडल्या तरी 'सामना'त रिफायनरीची जाहिरात छापून आल्यामुळे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात उघडपणे रिफायनरीच समर्थन केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा सभा घेऊन रिफायनरीविरोधातली आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली. साहजिकच कोंडी झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हा परिषद सदस्यांच्या हकालपट्टीची घोषणा करीत आपल्या फुटीर कार्यकर्त्याना इशारा द्यावा लागला आहे.
हे वाचा - नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत उभी फूट, कोकणातील राजकारण तापलं
‘आणि एक सांगुन ठेवतो जो कुणी शिवसेनेचा भगवा गमचा घालून रिफायनरीच समर्थन करेल त्याच मिळेल त्या चपलेने थोबाड फोडा’’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांची ढाल करुन रिफायनरीला अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न जरी कोणी केला असेल तरी रिफायनरी पुन्हा या भागात होणार नाही, अशी ग्वाही शासनाच्यावतीने मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपला शब्द फिरवणार नाहीत, असा विश्वास असल्याचे रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी व्य़क्त केला आहे.
"कुणी म्हणतंय की तीन पक्षांचं सरकार आहे, म्हणून उध्दव ठाकरेंवर दबाव येऊन ते भूमिका बदलतील. पण ते वंदनीय बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. ते शब्द फिरवणार नाहीत याची खात्री आहे, असे रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम म्हणाले.