गडचिरोली, 2 मे : गडचिरोलीत माओवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. माओवाद्यांनी 25 एप्रिलच्या आधीपासूनच या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. तर जवानांवर हल्ला करून, जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. छत्तीसगड आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या चार-पाच दलांनी एकत्र येऊन एक कंपनी तयार केली. जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी दानापूर येथे वाहनांची जाळपोळ केली. शीघ्र कृती दलाचे जवान खासगी वाहनातून निघाले असता, त्याची प्रत्येक माहिती खबऱ्यांमार्फत माओवाद्यांपर्यंत पोहोचत होती.
माओवाद्यांच्या स्थानिक दलाने हल्ल्याचा कट रचला आणि इतर दलाची मदत घेतली. हल्ला केल्यानंतर लगेच नक्षलवादी दंडकारण्यात पळून गेले. दंडकारण्य हे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांच्या मध्ये असलेलं घनदाट जंगल आहे आणि इथे केवळ माओवादीच जातात.
सी60 कमांडो जवानांवर हल्ला करताना या परिसरात 150 पेक्षा जास्त नक्षलवादी होते. स्फोट घडवल्यानंतर जवानांच्या मृत्यूची खात्री करुनच नक्षली पसार झाले.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले. माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूरखेडा गावाजवळील ही घटना आहे.
SPECIAL REPORT : 'झाडाच्या आडोश्याला जेवण, दुसरा जवान देतो पहारा' जंगलातला एक दिवस C-60 कमांडोंसोबत!