सातारा, 5 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. मात्र काही मतदारसंघ असे आहेत जिथे युतीत घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कणकवलीनंतर साताऱ्याच्या माण खटाव तालुक्यातही भाजपनंतर शिवसेनेनंही आपला उमेदवार दिला आहे.
साताऱ्यातील माण-खटाव हा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. कारण या मतदारसंघात दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेसमधून आलेल्या जयकुमार गोरे यांना भाजपने तिकीट दिलं. पण त्यानंतर शिवसेनेनं शेखर गोरे यांना उमेदवारी देत जयकुमार गोरेंना आव्हान दिलं आहे.
माण-खटाव मतदारसंघात गोरे बंधूंमधील राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष पुन्हा एकदा उभाळून वर आला आहे. त्यातच आता एकाला भाजप तर दुसऱ्याला शिवसेनेनं तिकीट दिल्याने गोरे बंधूंमधील राजकीय लढाई आणखीनच तीव्र होणार आहे.
माण -खटाव मतदरासंघात चौरंगी लढत
1)जयकुमार गोरे- भाजप
2)शेखर गोरे- शिवसेना
3)प्रभाकर देशमुख- राष्ट्रवादी
4)अनिल देसाई, आमचं ठरलंय माण विकास आघाडी
राज्यात युतीला बंडखोरीचं ग्रहण
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युतीची स्थिती मजबूत दिसत होती. मात्र तिकीटवाटपानंतर दोन्ही पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे.
तिकीट न मिळाल्याने शिवसेना-भाजपमध्ये नाराज झालेल्या काही नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाट धरली तर काहींनी अपक्ष लढणं पसंत केलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. एकूणच अनेक मतदारसंघात बंडखोरांनी डोकं वर काढल्याने युतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा