मुंबई, 16 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपने केलेल्या आरोपांवर शायरी शेअर करत उत्तर दिलं आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. विरोधी विचारधारेच्या काँग्रेससोबत सरकार स्थापनेवरून भाजप शिवसेनेवर टीका करत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केलेल्या टीकांची आठवण करून देत आहेत. यावर संजय राऊत यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांची शायरी शेअर केली आहे. 'यारों नए मौसम ने ये एहसान किया है. याद मुझे दर्द पुराने नहीं आते.' अशी ही शायरी आहे. भाजप आणि त्यांचे समर्थक शिवसेनेने आघाडीच्या नेत्यांवर केलेल्या टीकेची आठवण करून देत आहेत. यामध्ये संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेचा समावेश आहे. यातच राऊत यांनी केलेलं हे ट्विट भाजपला प्रत्युत्तर असल्याचं मानलं जातं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 16, 2019
निवडणुकीआधी भाजप-सेना यांच्यात युती झाली होती. पण एकत्र निवडणुका लढलेल्या भाजप-सेनेमध्ये निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून मतभेद झाले. अखेर भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. दरम्यान, निकालापासून संजय राऊत यांनी भाजपवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. त्यांनी फक्त जे ठरलं ते करा एवढंच सांगत मुख्यमंत्रिपदावर ठाम भूमिका घेतली. शेवटी यावर काहीच तोडगा न निघाल्याने सेनेनं रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांना पुरेसं संख्याबळ नसल्यानं दावा करता आला नाही. अखेर राज्यपालांनी केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दुसरीकडे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा अखेरच्या टप्प्यात आल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा