सोलापूर, 17 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. सकाळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. हे वृत्त येताच राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. तसेच अनेक तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. या भेटीत नेमकं काय घडलं? दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्या विषयांवर चर्चा झाली? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटी दरम्यान महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याबद्दल चर्चा झाली आहे. काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबाबतची दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांत झालेल्या या भेटीमुळे राजकीय उलधापालथ संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या सर्व चर्चा सुरू असताना आता या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया (NCP first reaction on Sharad Pawar Narendra Modi meeting) आली आहे.
सोलापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, देशातील ज्या नागरी अर्बन आणि सहकारी बँका आहेत त्या बँकांवर काही निर्बंध रिझर्व्ह बँकेने आणले आहेत. या निर्बंधामुळे देशात ज्या सहकारी क्षेत्रातील बँका आहेत त्या बँकांचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि त्यावर आणखी एक मंडळ जे त्यांना मार्गदर्शन आणि सल्ले देईल अशी एक वेगळी रचना आरबीआयने केली आहे. पूर्वी नाबार्डचं बंधन या सर्व बँकांवर होतं. नाबार्डचं बंधन काढून केंद्राने आरबीआयचं बंधन घातलं आहे. देशात राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका नागरिकांना दाद देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये सहकार क्षेत्र भक्कमपणे उभं राहिलं. बँकांना आता निर्बंधांत आणण्यात आले आहे आणि हे निर्बंध कमी करण्याच्या आग्रही मागणीसाठी शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, NCP, Sharad pawar