मुंबई, 18 मार्च : मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एअर स्ट्राईकबाबत केलेल्या एका कथित वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी याबाबत एका फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.
'मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती. परंतु प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांची फेसबुक पोस्ट
"पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला.
परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती.
भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे."
VIDEO: शरद पवारांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंची मोदींवर चौफेर टीका