सांगली, 11 एप्रिल : 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसबाबत (Coronavirus) वादग्रस्त वक्तव्य करून राज्यभरात चर्चेचा धुरळा उडवून दिला होता. 'कोरोना हा आजारच नाही, तो फक्त विशिष्ट लोकांनाच होणार आजार आहे,' असं म्हणत संभाजी भिडे यांनी एक आक्षेपार्ह शब्द वापरला होता. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी संभाजी भिडे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
'संभाजी भिंडेंचे वक्तव्य हे निषेधार्ह आहे. सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असताना अशी विधाने ही कोरोनाला आळा घालण्यासाठी बाधा ठरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनाही कोरोना झाला होता,' असं म्हणत जयंत पाटील यांनी टोलेबाजी केली आहे.
दरम्यान, संभाजी भिडे हे हिंदुत्ववादी विचारसणीचे असल्याने ते संघ आणि भाजपच्या जवळचे मानले जातात. मात्र त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांना फारसा कधी विरोध केला नाही, असा आक्षेप घेतला जातो. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी उघडपणे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, संपूर्ण लॉकडाऊन लागल्यास शहरातून गावाला जाण्यास मुभा देणार?
नक्की काय म्हणाले होते संभाजी भिडे?
'कोरोना अस्तित्वात नाही. सरकारने काहीही करू नये, ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही. जे कोरोनामुळे मरतात ते जगण्यास लायक नाहीत,' असं म्हणत सांगलीमध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी बेताल वक्तव्य केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jayant patil, Sangali