सांगली, 25 मे : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्या विकास निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. यावेळी शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
शरद पवारांच्या टीका करताना आमदार खोत म्हणाले, नुकतंच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी म्हटले होते, ब्राह्मण समाजाने कधी आरक्षण मागितले नाही आणि कुणाला आरक्षण देऊ नये. पण पवार साहेबांनी ट्विट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका असे सांगितले. पण ब्राम्हण समाज ओरडून सांगत आहे, आम्ही असं म्हटलं नाही.
म्हणून बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे. पवारांमध्ये कोणते स्पेअर पार्ट कुठले घातले होते? एवढा हुशार माणूस झाला कसा ? मला वाटते की ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला. त्यामुळे इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही असा खोचक टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
मी आणि गोपीचंद पडळकर पागल माणसं.... क्रांती करायला पागल माणसं लागतात, शहाणी माणसे क्रांती करत नाहीत, शहाणी माणसे अभ्यास करतात. शहाणी माणसं तत्वज्ञान शिकवतात. पागल माणसं क्रांती करतात. त्यामुळे आम्ही दोघां पागलांना राज्यात क्रांती करायची आहे आणि मी पुन्हा येईन हे खरं करायचे आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. अनेक अडचणी शेतकऱ्यांना आहेत. द्राक्ष बागा झोपल्या आहेत. कांदा शेतकऱ्याची वाट लागली आहे. पण सरकारची मदत मिळत नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना हर्बल तंबाखू पेरा करण्याचा परवानगी द्यावी विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर आणि आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना हर्बल शेती बियाणं देण्याची देण्याची मागणी करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.