शिर्डी, 28 नोव्हेंबर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित आज शिर्डीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (RPI) मेळावा पार पडला. या मेळाव्यात आरपीआयचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत आठवले यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे. संजय राऊतांनी केलेल्या ट्विटला हम भी नही है कुछ कम, असं जोरदार प्रत्युत्तर देत ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. तसंच यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे.
'उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा भाजपासोबत यावं. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपसोबत येण्याची गरज असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने जाणं योग्य नाही. तुम्हाला दोन वर्षासाठी मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेईन,' असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे.
'उद्धव ठाकरे यांचे सरकार कधी जाणार, यापेक्षा आमचा प्रश्न आहे अजित पवार पुन्हा भाजपासोबत कधी येणार? याआधी सुद्धा ते आमच्या सोबत आलेले आहेत. फडणवीस म्हणतात की पुन्हा येईन.. अजित दादा आले तर पुन्हा येणार हे त्यांना माहीत आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच जाणार असून तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम न करता एकमेकांवर टीका करत आहेत,' असंही आठवले यांनी सांगितलं आहे.
युपीए नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्याची शक्यता व्यक्त करत हे सरकार पडलं की आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav thackeray