रत्नागिरी, 06 मे: कोकणातल्या गुहागरमधून (Guhagar) एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाची लागण (corona Positive) झालेली असतानाही नवरदेवानं इतरांचा जीव धोक्यात घालत संपूर्ण विवाह सोहळा साजरा केला. त्यामुळं अनेकांमध्ये संसर्ग (corona infection) पसरण्याची शक्यता आहे. तर ग्रामपंचायतीनं वरातीमागून घोडे नाचवत नंतर 50 हजारांच्या दंडाची वसुली केली.
(वाचा-या देशात 12 वर्षांच्या मुलांना मिळणार Corona लस, Pfizer ला मिळाली मान्यता)
गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथील सूरज घेवडे यानं हे बेजबाबदारपणाचं कृत्य केलं आहे. सूरज याचं दोन दिवसांपूर्वी लग्न होणार होतं. त्यामुळं लग्नासाठी नवरी मुलीकडील 10 जण आणि नवरदेवाकडील 10 जण अशा सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश होते. त्यानुसार दोन्हा बाजुच्या लोकांनी चाचणी केली. पण या चाचणीच्या निकालांमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, नवरदेव सूरज घेवडे याचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट आल्यानंतर प्रशासनानं सूरजला होम आयसोलेशन किंवा गरज असल्यास कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. लग्न पुढं ढकलण्यासही सांगण्यात आलं. अगदीच लग्न पुढं ढकलणं शक्य नसेल तर प्रशासनाची परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
(वाचा-सावधान! कोरोना रुग्णांना Steroids देणं घातक; भोगावे लागतील गंभीर परिणाम)
लग्नाच्या एका दिवसापूर्वीच नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानं सगळ्यांच्या चिंता वाढल्या. पण नवरदेव असलेल्या सूरज यानं अत्यंत बेजबाबदार असा निर्णय घेतला. कशाचीही पर्वा न करता त्यानं लग्न सोहळा उरकायचं ठरवलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणं सूरज लग्नासाठी नवरीच्या घरी गेला, संपूर्ण सोहळा विधिवत उरकला. पण या दरम्यान सूरजनं अनेकांच्या जीवाला जाणीवपूर्वक धोका निर्माण केला. कारण कोरोनाची लागण झालेली असताना सर्व नातेवाईकांसह त्यानं हा सोहळा उरकला. विशेष म्हणजे केवळ 2 तासांची परवानगी असताना अनेक तास हा विवाह सोहळा चालल्याचं पाहायला मिळालं.
या प्रकारानंतर प्रशासनानं वरातीमागून घोडं नाचवायचं म्हणून शासकीय नियमांचं पालन न केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली. ग्राम कृतीदलानं सूरज घेवडेकडून 50 हजारांचा दंड वसूल केला. पण दंड वसूल केला असला तरी आता नवरदेवाच्या माध्यमातून इतरांना संसर्ग पसरला असेल, आणि त्यापैकी कोणाला धोका निर्माण झाला तर त्याची भरपाई कशी करणार.
कोरोनाच्या या काळात कोरोनाची लागण झालेल्या काही जणांचं लग्नही झालं. मात्र त्यांनी अत्यंत खबरदारी घेत, पीपीई किट घालून, अगदी मोजक्या चार लोकांमध्ये विवाह सोहळा उरकला. मात्र याठिकाणी अत्यंत बेजबाबदार असं कृत्य या नवरदेवानं केलं. त्याचा काय परिणाम पुढे येणार हे लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra, Marriage, Mumbai, Ratnagiri, Wedding