मुंबई, 02 ऑगस्ट : येत्या तीन दिवसांत अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यावरून राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. भाजपने निमंत्रणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'राम मंदिर हा सेनेसाठी श्रद्धेचा विषय आहे' असं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला 200 निमंत्रितांना बोलवण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. परंतु, भाजप पाठोपाठ विहिंपने उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. एवढंच नाहीतर उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन सोहळ्याला येऊ नये, असंही म्हटले होते.
सुप्रिया सुळे यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंची सांत्वन भेट
विहिंपच्या भूमिकेचा समाचार घेत एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये बोलत असताना जोरदार पलटवार केला आहे. 'शिवसेनेसाठी राम मंदिर हा राजकारणाचा नव्हे तर श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी बजावलं.
तसंच, 'जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही अयोध्येला गेले होते, त्यामुळे हा श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रश्न आहे', अशी आठवण करून एकनाथ शिंदेंनी टोला लगावला.
पुढच्या 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
तसंच, 'राज्यावर कोरोनाचे संकट बिकट आहे. अशा परिस्थितीत राजकारण करण्याची वेळ नाही. भाजपकडून 'ऑपरेशन लोटस'ची हवा केली जात आहे, पण महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार कोसळणार नाही आणि अशी शक्यताही नाही', असं एकनाथ शिंदेंनी ठणकावून सांगितलं.
तसंच, अलीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असं वक्तव्य केले होते. यावर शिंदे म्हणाले की,'लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. ते जे काही बोलता त्यावर फक्त चर्चा होऊ शकते, पण यामुळे सरकारला कोणताही धोका नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.