सोलापूर, 29 एप्रिल : महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा (Raj Thackeray Rally in Aurangabad) होणार आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटींसह परवानगी दिली आहे. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबाद पोलिसांकडून सभेला परवानी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्याच दरम्यान भीम आर्मीने (Bhim Army) राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
भीम आर्मीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे होणारी जाहीर सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीसानी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे. राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाने 16 अटी दिल्या आहे. त्या अटींचे उल्लंघन झाल्यास भीम आर्मीकडून महापुरुषांच्या नावाच्या घोषणा सभेच्या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी दिली आहे.
सभेसाठी महत्त्वाच्या अटी
सभास्थळी आसनमर्यादा ही 15 हजार इतकी आहे. त्यामुळे 15 हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरलं जाईल.
सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळथ असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
सभा ही 1 मे रोजी संध्याकाळी साडेचार ते रात्री पावणे दहा वाजेच्या वेळेत आयोजित करण्यात यावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळत कोणताही बदल करण्यात येऊ नये.
सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेत येताना किंवा जाताना कुणीही आक्षेपार्ह विधान, वर्तवणूक, घोषणाबाजी, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सभेला येणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. वाहनांनी शहरात आणि इतर ठिकाणी वेगमर्यादाचे पालन करावे. सभेसाठी येताना-जाताना कार किंवा बाईक रॅली काढू नये.
कार्यक्रमवेळी कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये आणि त्यांचं प्रदर्शन करु नये.
स्वयंसेवक नेमण्यात यावे. त्यांची नावे, मोबाईल नंबर पोलिसांना द्यावे. तसेच कोणत्या गावातून किती नागरीक येणार, त्यांची संख्या आणि त्यांच्या वाहनांचा प्रवासाचा मार्ग विषयी माहिती पोलिसांना द्यावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाजाची मर्यादा असावी. त्या नियमांचा भंग केल्यास 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंडांची शिक्षा होऊ शकते.
सभेदरम्यान बस, मेडिकल, वीज, रुग्णवाहिका अशा इत्यादी अत्यावश्यक सेवांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेसाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.