पुणे, 06 एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackarey) यांनी कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन करून एक प्रकारे महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. तसंच राज्यात लवकरच तिसऱ्या मंत्र्याचाही राजीनामा झालेला बघायला मिळेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलण्याआधी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी असे देखील म्हटले आहे की, पुण्यातला वर्धापन दिनाचा कार्यक्रम आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळूनच घेत आहोत.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी असा देखील आरोप केला आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी विकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा केली गेली मात्र पत्रक पूर्ण लॉकडाऊनचं काढलं गेलं. फडणवीसांना खोटी माहिती दिल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजप आणि सर्वसामान्य जनता हे सहन करणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील असं म्हणाले की, 'येणाऱ्या 8 दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे. हे सरकार त्यांच्या कर्माने मरेल'.
यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीविषयीही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, कोव्हिडच्या सावटामध्ये जनतेबरोबर राहण्याचा आणि त्यांना दु:खातून बाहेर काढण्याचा आमचा निश्चय आहे. ऑक्सिजन, बेड देखील वाढण्याचा निश्चय असल्याचं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Devendra Fadnavis, Uddhav tahckeray