ठाणे, 18 सप्टेंबर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) अद्यापही कायम आहे. त्यामुळे नियमांचे पालन करण्याचं आवाहन सरकारकडून सतत्याने करण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी अनेक ठिकआणी नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात बार (Bar) सुरू असून त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई (Police raid on bar) केली आहे. पोलिसांनी बारवर छापा टाकला त्यावेळी तेथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने एका बारवर गुरुवारी रात्री छापा टाकला आणि कारवाई केली. यावेळी बारमध्ये अश्लिल कृत्य करत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी घटनास्थळावरुन 10 महिलांसह 21 जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एका टीमने कल्याण-मानपाडा रोडवर असलेल्या एका बारवर छापा मारला. यावेळी बारमध्ये अनेकजण हे फेसमास्क शिवाय आढळून आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं. इतकेच नाही तर ग्राहकांना दारू आणि इतर अन्नपदार्थ सर्व करणाऱ्या महिलांनी योग्य कपडे परिधान केले नव्हते. यासोबतच अश्लिल कृत्य सुद्धा सुरू होते.
पोलिसांनी सांगितले की, आम्ही बारमधून 10 महिलांसह वेटर आणि 19 ग्राहकांसह दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यासोबतच म्युझिक सिस्टम आणि 24300 रुपयांचे इतरही साहित्य जप्त केले आहेत. या सर्वांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11.21 लाखांचे मादक पदार्थ जप्त
ठाणे शहरात दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी एका 31 वर्षीय व्यक्तीला मादक पदार्थांसह अटक केली आहे. आरोपीकडून केटामाइन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तब्बल 11.12 लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी शुक्रवारी याच्या संदर्भातील माहिती दिली. ठाणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी घोडबंदर रोड येथील आनंद नगर परिसरात सापळा रचला. आरोपी वैभव नरेंद्र सिंह हा तेथे येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
आरोपी वैभव याच्याकडून 11.21 लाख रुपयांचे केटामाइन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या विरोधात नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सटेंस (एनडीपीएस) अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
उल्हासनगरमध्ये भरदिवसा 5 गुंडांनी केली तरुणाची हत्या
उल्हासनगरमधील कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुशांत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. पाच जणांच्या टोळीने सुशांतची हत्या केली. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी चाकू, तलवारी आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून ही हत्या करण्यात आली होती. हत्या करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, ही हत्या करणाऱ्या आणि विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असलेल्या गुंड आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याचे साथीदार अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, अवी थोरात आणि यश रुपवते यांना अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.