जालना, 13 मे- दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील एका शेतकरी वधुपित्याने आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळमुक्तीचा उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचं संदेश देण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. वरातींना दुष्काळग्रस्त वधूपित्यानं अनोखा आहेर दिला आहे.
संपूर्ण मराठवाड्यात सध्या भयावह दुष्काळ स्थिती पाहायला मिळतेय. त्यातल्यात्यात जालना जिल्हा म्हणजे दुष्काळाचं ब्रँड अॅम्बेसिडरच म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पाणीप्रश्न तर जणू जालनेकरांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. मात्र, दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठीही पायपीट करावी लागतेय. अशा बिकट परिस्थितीत मुलीचं लग्न करणं म्हणजे शेतकऱ्याचं काळीजच चिर्रर होतंय.
साधारणतः लग्न म्हटलं की बँड, बाजा, वरात, धमाल, मस्ती आणि धांगडधिंगा...आपलं किंवा आपल्या कुटुंबियातील एखाद्या व्यक्तीचं लग्न समारंभ अविस्मरणीय करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावतात.
जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपरी तळेगाव येथील कचरू पाटील शिंदे यांनी सतत वृक्षतोडीमुळे पडलेल्या दुष्काळाचे चित्र नजरेसमोर ठेवून आपली मुलगी स्वातीच्या लग्न समारंभामध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे संदेश देण्यासाठी अनोखा असा उपक्रम राबविला. लग्न मांडपात ठिकठिकाणी वृक्षारोपनाचे महत्त्व विशद करणारे अनेक फलक लावले. मंडपाच्या सजावटीसाठी देखील अधिकाधिक वेगवेगळ्या रोप, वेली आणि फुलांचाच वापर करण्यात आला. वरात विवाहस्थळी येताच लग्न मंडपात प्रवेश करण्यापूर्वी नवरदेव आणि नववधूच्या हस्ते मांडवाबाहेरच वृक्षारोपण करण्यात आले. एवढंच नव्हे तर त्यांनी इतर कुठलाही वायफळ खर्च न करता 500 हून अधिक कलमी आंब्याचे रोपट्याचा हटके आहेर लग्नात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना एक आठवण म्हणून भेट दिली.
विशेष म्हणजे रोप वाटप करते वेळेस प्रत्येक पाहुण्यांना योग्य मार्गदर्शन देऊन व पर्यावरणाचे चित्र समोर ठेवून या वृक्षलागवडीचा संदेश ही त्यांनी या संकल्पनेतून दिला की आपण या पुढे कुठलेही झाडे तोडणार नाही व या वृक्षाचे आपल्या मुला प्रमाणेच याचा सांभाळ करा.
जालन्यातील शिंदे पाटील कुटुंबियांनी या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून रचलेलं हा नवीन पायंडा जिल्ह्यासह राज्यात सतत पडणाऱ्या दुष्काळाला काही अंशी मात देईल आणि पर्यावरणाचं संतुलन ठेऊन शेतकरी व नागरिकांना पण्याच्याबाबतीत मोठं दिलासा देईल, यात तिळमात्रही शंका नाही.
बीड जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यात काय म्हणाले शरद पवार? पाहा हा VIDEO