नवी मुंबई, 2 मार्च : नवी मुंबई (Navi Mumbai) एक झगमगतं शहर... या झगमगत्या शहरातील आदिवासी मुलं मात्र अंधारात शिकत असल्याचं दुर्दैवी चित्र आहे. नवी मुंबईतील खारघरमध्ये करोडो रुपये खर्चून गोल्फकोर्स, सेंट्रल पार्क उभारली गेली. परंतु याच श्रीमंतांची चोचले पुरवणाऱ्या पार्कच्या शेजारी असलेल्या धामोळे शाळेतील 53 विद्यार्थी अंधारात शिकत (No Electricity In School ) असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महावितरण विभागाच्या जुलमी वाढीव वीज बिलांमुळे या शाळेचं वीज कनेक्शन कट करण्यात आलं आहे. संपूर्ण वर्षभर शाळा बंद असतानाही या शाळेला 11 हजार 620 रुपये बिल आलं. जे की दोन खोल्यांच्या या शाळेला फक्त दर महिना फक्त 400 ते 500 रुपये बिल येत होतं. ते बिल ही शिक्षक भरत होते. कारण या शाळेला ना जिल्हा परिषद वाली आहे ना पनवेल महापालिका.
हेही वाचा - मोठी बातमी : ICSE दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
27 फेब्रुवारी पासून ही मुले अंधारात शिक्षण घेत आहेत. शिक्षक आपल्या खिशातून 50 टक्के बिलाची रक्कम भरण्यास तयार झाले. मात्र मुजोर महावितरणचे अधिकारी पूर्ण रक्कम भरल्याशिवाय वीज कनेक्शन जोडणार नाही म्हणून सांगत आहेत. फक्त सूर्यप्रकाशावर वर्ग चालवणाऱ्या वर्गात कधीच वीज न वापरणाऱ्या शिक्षकांना अचानक कोरोना काळात म्हणजे सप्टेंबर महिन्यात 700 युनिट जाळवल्याचे दाखवल्याने शिक्षक चक्रावले. ना शिक्षक ना विद्यार्थी मग वीज कोणी जाळली.. याचं उत्तर देणारं कोणीच नाही.
पालकत्व असणाऱ्या जिल्हा परिषदेने तर वाऱ्यावर सोडायचं ठरवलं आहे. पनवेल महापालिकाही पालकत्व स्वीकारायला तयार नाही. कारण या शाळेत 100 टक्के विद्यार्थी हे आदिवासी आहेत आणि ते ही प्रवाहाच्या बाहेर असणारे विद्यार्थी. दुर्दैव या गोष्टीचं आहे की या शाळेत राज्य शासनाकडून पोषण आहार म्हणजे (दूध) हे देखील शासनाऐवजी ऐका दानशूर व्यक्तीकडून दिले जात आहे. त्यामुळे आगामी काळात तरी प्रशासनाकडून या शाळेकडे लक्ष दिलं जावं, अशी मागणी आता समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School