भिवंडी, 20 सप्टेंबर : रस्ते अपघातात जखमी झालेला नागरिक उपचारासाठी आला असता सदर रुग्णाला तडफडत रुग्णवाहिकेत बसावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने रुग्णावर वेळेत उपचार झाले नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने अपघात झालेल्या रुग्णावर उपचार होत नसल्याने संबधित आरोग्य केंद्राच्या डॉक्टरणावर फौजदारी कारवाई करण्याची रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. पडघा गावच्या अंतर्गत असलेल्या पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर पावरा हे नियमित उपस्थित राहत नसल्याने तसेच या दवाखान्यात नर्स ,तसेच वर्डबॉय हे कधीतरी कामावर येत असल्याचे आरोप रुग्णाचे नातेवाईक करत आहेत.
या रुग्णालयातून रुग्णांना उपचारा अभावी इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत असल्याचंही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कधीकधी तर उपचार न मिळाल्याने रुग्ण तेथेच मृत्यूमुखी पडतात असा आरोपही नातेवाई करत आहेत. त्यामुळे या पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे मुंबई - नाशिक महामार्गवर पडघा आरोग्य केंद्र असल्याने या महामार्गावर नेहमी होणाऱ्या अपघातातील जखमींना या आरोग्य केंद्रात आणण्यात येते. मात्र इथं डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमींना तडफडत राहावे लागते किंवा 15 किलोमीटर अंतरावर भिवंडीतील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे उपचारा अभावी जखमीचा मृत्यू सुद्धा होण्याची भीती असते.
याबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.