मुंबई, 4 जानेवारी : नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलली आहेत. कारण आघाडीत हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत शरद पवार काय निर्णय घेतात, यावर पुढील समीकरणं अवलंबून आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीसाठी 50-50 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यातील काही जागा दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना सोडणार आहेत. त्यामुळे भाजपवर सध्या नाराज झालेले नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जर महाआघाडीत आला तर राष्ट्रवादी कोकणात राणेंना मदत करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष जो उमेदवार देईल त्याला भास्कर जाधव यांनी मदत करावी, असा निर्णय राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत झाला. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणे स्वत: लढले तर भास्कर जाधव मदत करू शकतात. पण निलेश राणेंची उमेदवारी पुढे आली तर जाधव मदत करणार नाहीत. कारण निलेश राणेंनी भास्कर जाधवांचे कार्यालय फोडले होते.
आघाडीचा फॉर्म्युला ठरला
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे. तसंच त्यातील दोन्ही पक्ष आता आपल्या वाट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार आहेत. राज्यात भाजपविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बऱ्याच बैठकानंतर दोन्ही पक्षांचं आता जागावाटपावर एकमत झालं आहे.
Special Report : नारायण राणेंचं नेमकं काय चाललंय?