मुंबई, 8 फेब्रुवारी : 'मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. परंतु हा फरक एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत,' अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत आज बोलताना शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांनी यू-टर्न घेतल्याचा आरोप केला. त्यावर नवाब मलिक यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला.
'सुरुवातीपासून पवारसाहेबांच्या नावाने स्वतःची केलेली चूक कशी व्यवस्थित आहे हे भाजप मांडत आहे. मोदींना आजपर्यंत कळलंच नाही पवारसाहेब या देशातील कृषी सुधार समर्थक होते तेव्हापण आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्यसरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. मला वाटतं हाच फरक मोदींना कळत नाही,' अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा - शरद पवारांच्या भूमिकेवर PM मोदींकडून टीका, अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर
राष्ट्रवादीने PM मोदींकडून व्यक्त केली ही अपेक्षा
'आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही, पण एकमत निर्माण करणे. लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे हे गरजेचे असताना आपलंच मत रेटण्याची भूमिका पंतप्रधान घेत असतील किंवा सरकार घेत असेल तर ते योग्य नाही,' असंही नवाब मलिक म्हणाले.
नवीन सुधारणा करण्याबाबत कायदा तयार करायचा असेल तर सरकारने सर्व विरोधकांना बोलावून विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. सर्वांना मान्य असेल तरच कायदा केला पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nawab malik, PM Naredra Modi