मुंबई, 21 मार्च: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसुख हिरेन मृत्यू ( Mansukh Hiren Death case) प्रकरण चांगलंच गाजत आहे. या मृत्यूप्रकरणात अनेक धक्कादायक आणि गंभीर खुलासे समोर आले आहेत. आता यामध्ये मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह (Param bir singh) यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढळवून निघालं आहे. त्यामुळे विरोधी पक्षानेही महाविकास आघाडी सरकारला पुरतं घेरलं आहे. त्यामुळे याप्रकरणात आता भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home minister Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विविध पक्ष त्यांच्यावर दबाब टाकत आहेत.
अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याप्रकरणात आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. जयंत पाटलांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवास स्थानी जावून भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी ट्वीट करत सांगितलं की, 'राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नचं उद्भवत नाही. मुंबईत जिलेटीन कोणी ठेवलं, मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधून काढणं सरकारचं प्राधान्य आहे.'
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर कार कोणी ठेवली, त्यात जिलेटीन कोणी ठेवले, मनसुख हिरेन यांच्या प्रकरणात काय झाले हे शोधून काढणे सरकारचे प्राधान्य आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 21, 2021
जयंत पाटलांनी आणखी एक ट्वीट करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले होते. त्यातल्या किती मंत्र्यांनी राजीनामे दिले? मी त्याच्या तपशीलात जात नाही. पण या प्रकरणात लक्ष विचलित न करता दोषींवर कारवाई व्हायला हवी.' असंही त्यांनी म्हटलं.
हे ही वाचा -गृहमंत्र्यांबाबत परमवीर सिंह यांनी केलेला दावा खोटा? CNN News18कडे कागदपत्रे
राज्यातील मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांनी पुढं म्हटलं की, 'याप्रकरणात एटीएस, एनआयए यांसारख्या तपास यंत्रणा काम करत आहेत. शिवाय एटीएसनं दोन संशयित आरोपींनाही अटक केली आहे. त्यामुळे तपास पुर्ण झाल्यानंतर लवकर सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Jayant patil, Sachin vaze, Tweet