प्रफुल्ल साळुंखे, नवी मुंबई, 4 फेब्रुवारी : नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. ही महापालिका निवडणूक काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार आहेत. याच निवडणुकीची तयारी म्हणून वाशी येथे महाआघडीचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक आणि कुटुंबावर घणाघाती टीका केली आहे.
'आगामी निवडणुकीनंतर नवी मुंबईत कुणी महापौर होईल, कुणी स्थायी समिती अध्यक्ष होतील, कुणी सभापती होतील, पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटले आहेत. महाआघाडीच्या नवी मुंबईतील मेळाव्यात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण हे उपस्थित आहेत.
अजित पवार आक्रमक
'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. नवी मुंबईतील एकाधिकार शाही खपवून घ्यायची नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी नाईक कुटुंबाच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. तसंच ज्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकपद मिळणार नाही, त्यांना महामंडळ आणि जिल्हा समित्यांवर घेणार, असं म्हणत अजित पवार यांनी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतला आहे.
अशोक चव्हाणांची फटकेबाजी
'नियतीला मान्य होतं, म्हणून महाआघाडीचे सरकार आले. हे सरकार येत्या 15 वर्ष टिकेल, आम्ही सत्ता टिकावी म्हणून एकत्र. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला त्यांचं अभिनंदन. आम्ही तिघे सोबत असलो की भाजप कधी सत्तेत येणार नाही. आम्ही शांततेत कारभार करतो, अजित पवार यांचं सर्व धडाकेबाज असतं. अजितदादा नगरविकासकडे बघाल तसं आमच्या रस्ते विभागकडेही प्रेमाने बघा, राज्यातले रस्ते करायचे आहेत,' असं म्हणत अशोक चव्हाण यांनी या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.