मुंबई, 9 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सकाळी 11 वाजता त्यांच्या Sharad Pawar या फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही सोशल मीडियाचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत.
सोशल मीडियाचा वापर करून भाजपने आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्या तुलनेत या तंत्राचा प्रभावी वापर करणं विरोधकांना जमलं नाही. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळात असा फटका बसू नये म्हणून शरद पवार यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
कोणत्या मुद्द्यांवर शरद पवार साधणार संवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून रोजी वर्धापन दिन आहे. त्याआधी होणाऱ्या या संवादात शरद पवार पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी बोलण्याची शक्यता आहे. तसंच ते फेसबुकवरून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेणार आहेत.
सध्या राज्यभरात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असली तरीही अनेक भागात अजूनही तीव्र पाणीटंचाई आहे. याबाबतही शरद पवार लोकांच्या भावना जाणून घेतील.
दरम्यान, फेसबुक पेजवरून शरद पवार हे सर्वसामान्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर देणार आहेत. लोकांनी आपल्या नाव-गावासह प्रश्न विचारावेत. त्यातील निवडक प्रश्नांना शरद पवार उत्तर देतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
VIDEO: निवडणुकीनंतर अर्जुन खोतकरांबद्दल दानवेंचा मोठा गौप्यस्फोट