वणी, 4 मार्च : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सजावट केलेल्या 1 टन द्राक्षाची शुक्रवारी चोरी झाली. हे द्राक्ष कुणी नेले याचा थांगपत्ता लागलेला नसताना नाशिकच्या सप्तश्रुंगी देवी मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला आहे, त्यामुळे राज्यातल्या मोठ्या देवस्थानांमध्ये चाललंय काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ असलेलं आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे वणीची सप्तश्रुंगी देवी. राज्यभरातूनच नाही तर देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येतात. भाविक वस्तू, रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरुपात देणगी देत असतात. मात्र देवीच्या याच दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या आहेत. चोरट्यांनी मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराला चुना लावत ही चोरी केली आहे. चोरीची ही घटना 13 फेब्रुवारीची आहे, मात्र 20 दिवसांनंतरही कुणाला कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही असतानाही ही चोरी झाली कशी? त्यामुळे सप्तश्रुंगी गडाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.