नाशिक, 25 मे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात राहणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच या मजुरांनी गावाकडचा रस्ता धरला. मात्र अशातच मुंबईवरून अकोल्याला चालत जाणाऱ्या कष्टकऱ्याच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
लॉकडाऊनचा गैरफायदा घेणारा शातीर गुन्हेगार गणेश बांगर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. जळगाव आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत त्याच्या मुसक्या आवळल्या. मुंबईहून अकोल्याला पायी जाणाऱ्या कष्टकऱ्याच्या अल्पवयीन मुलीला या गणेश बांगरनं पळवून नेलं होतं. जळगावच्या नशिराबाद हायवेवरील 19 मे रोजी ही घटना घडली. या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. जळगाव पोलिसांनी जलदगतीनं केलेल्या हालचालींनी या मुलीला अमरावती जिल्ह्यातील लोणी येथे सोडवण्यात यश मिळवलं होतं.
गणेश बांगर होता तब्बल 14 गुन्हांत वॉन्टेड
मुलीला पळवल्याची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांनी फरार आरोपीच्या शोधासाठी 5 टीम्स रवाना केल्या होत्या. त्यानंतर तपासात गणेश बांगर हा अट्टल गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं. आरोपीच्या मागावर असलेल्या जळगाव पोलिसांना गणेश बांगरचा संगमनेर जवळ शोध लागला. त्याचा माग काढणाऱ्या जळगाव पोलिसांनी नाशिक पोलिसांची मदत घेतली आणि त्यानंतर अखेर फरार गणेश बांगरला नाशकात जेरबंद करण्यात यश आलं आहे.
दरम्यान, राज्यातील 7 जिल्ह्यातील 14 गुन्ह्यांत गणेश बांगर वॉन्टेड होता. त्याला आता जेरबंद करण्यात आल्यामुळे अनेक खळबळजनक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे.
संपादन - अक्षय शितोळे