महाड, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर नारायण राणे यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन आशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad yatra) दरम्यान महाड (Mahad) येथे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी महाड आणि पुण्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर महाड पोलिसांनी कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरा गुन्हा दाखल
नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक आणि महाड नंतर आता तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153, 153 ब (1) (क), 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक सायबर पोलिसांत शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "या गुन्ह्यात आरोपी भारत सरकारचे मंत्री असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचे विरोधात विधान केलेले आहे. गुन्ह्याची गंभीरता व्यापकता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर उपस्थित करणे आवश्यक असल्याने, एक पोलीस उप आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे उपयुक्त वाटते. संजय बारकुंड पोलीस उप आयुक्त नाशिक शहर यांनी एक टीम तरयार करुन मंत्री महोदय नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याची कार्यवाही करावी" असं नाशिक पोलिसांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान चिपळूण येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Pune, Raigad, Uddhav thackeray