चिपळूण, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आता स्वत: नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया (Narayan Rane first reaction after case registered against him) दिली आहे.
मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझी बदनामी करत असेल तर मी गुन्हा दाखवल करेन. माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची मला माहिती नाही. सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही. मुख्यमंत्र्यांकडून देशाचा अपमान झाला आहे. माहितीच्या आधारे मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहिती नाहीये. गुन्हा नसताना वॉरंट निघालं, अटक होणार चालू आहे. मी काय नॉर्मल माणूस वाटलो का तुम्हाला असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे आक्षेपार्ह, चिथावणीखोर वक्तव्य करतात त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल होत? असा सवालही नारायण राणेंनी विचारला आहे. नाशिक पोलिसांची इतकी तत्परता ही आदेशामुळे आहे. आमचं पण सरकार वर आहे ना? पाहूयात ना हे कुठपर्यंत उडी मारतात असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
नाशिक सायबर पोलिसांत शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "या गुन्ह्यात आरोपी भारत सरकारचे मंत्री असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचे विरोधात विधान केलेले आहे. गुन्ह्याची गंभीरता व्यापकता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर उपस्थित करणे आवश्यक असल्याने, एक पोलीस उप आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे उपयुक्त वाटते. संजय बारकुंड पोलीस उप आयुक्त नाशिक शहर यांनी एक टीम तरयार करुन मंत्री महोदय नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याची कार्यवाही करावी" असं नाशिक पोलिसांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान चिपळूण येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Uddhav thackeray