मुंबई, 27 मे : राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना अपात्र आमदारांच्या निर्णयाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता हालचालींना वेग आला आहे. दोन्ही गटाकडून पक्षाची घटना न मागवता आता निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाची घटना मागवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. यावरून विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राहुल नार्वेकरांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले झिरवाळ?
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी पक्षाची घटना तपासणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर आता झरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरात लवकर निर्णय घेणं ही केवळ राजकीय व्यासपीठावरील सभागृहाची भाषा आहे. असे निर्णय काही लवकर लागत नाहीत, असा खोचक टोला झिरवाळ यांनी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की या विषयात फार तपास करण्यासारखं काहीच नाही. मात्र तरी विधानसभा अध्यक्षांना खात्री करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टानं या खटल्यासंदर्भात दहा-बारा बाबी सांगितल्या आहेत, त्या सर्व विरोधात आहेत. त्यातील फक्त एकच बाब तपासायची आहे, असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
विधीमंडळाचा मोठा निर्णय
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे विधीमंडळ आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवणार आहे. निवडणूक आयुक्तांकडे जुलै 2022 मध्ये नोंदवण्यात आलेल्या पक्षाची घटना विधीमंडळ मागवणार आहे. त्यानुसार खरी शिवसेना कोणती याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shiv sena, Uddhav Thackeray