मुंबई,ता.28 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांचा विरोध डावलून नाणार प्रकल्प उभारण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम आहेत.नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
मुंबईत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थन केले.
नाणार प्रकल्पाला काहींचा विरोध आहे, पण चर्चेनं वाद सोडवू, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तर जमिन संपादन करणं हे कटू वास्तव आहे. त्यावर खुल्या मनाने चर्चा करून मार्ग काढू असं पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे ठणकावले होते. तर राणे यांनीही नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरतं.
सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी अराम्को ही नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार असून त्यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक होणार आहे. तर या प्रकल्पामुळं प्रचंड प्रदुषण होईल अशी भीती काही पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे कोकणचं पर्यावरण नष्ट होईल असा युक्तीवादही केला जात आहे. मात्र या सर्व शक्यता सरकारने ठामपणे फेटाळून लावल्या आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार या प्रकल्पाबाबात आग्रही असून हा प्रकल्प आला तर कोकणातल्या माणसांना रोजगार मिळेल त्याचबरोबर कोकणचा कायापालट होईल असा युक्तीवादही केला जातोय. मात्र राजकीय तोडगा निघाल्याशिवाय हा प्रकल्प सरकारला पुढे रेटता येणार नाही.
हेही वाचा...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra fadanavis, Nanar refinery project, Narayan rane, Ratnagiri, Uddhav thackeray, उद्धव ठाकरे, कोकण, देवेंद्र फडणवीस, नाणार, नारायण राणे, रत्नागिरी