अकोला, 14 मार्च : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे. नात्यातील लोकांना सत्तेत बसवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सध्याचं राजकारण हे घृणास्पद असल्याची टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसनं नाना पटोलेंना नितीन गडकरींच्या विरोधात दिलेल्या उमेदवारीवरून देखील पटोलेंची उमेदवारी डमी असल्याची टिका केली. शिवाय, समझोत्याचं राजकारण कराल तर जेलमध्ये जाल असा इशारा देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
यावेळी बोलताना मी कुठून लढणार हे लवकरच जाहीर करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून सुशिलकुमार शिंदे यांच्या विरोधात लढणार असल्याचं बोललं जात होतं. पण, त्यावर अद्याप तरी प्रकाश आंबेडकर यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा मतदारसंघ कोणता यावर सस्पेन्स अद्याप कायम आहे.
'भारिप' वंचित आघाडीत विलीन होणार - आंबेडकर
लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर गुरुवारी(14मार्च) यांनी केली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली ही लोकसभा निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
भारिप बहुजन महासंघ या नावाशी माझं भावनिक नातं असलं तरी पुढची वाटचाल ही वंचित बहुजन आघाडी म्हणूनच होणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
48 जागांवर लढणार वंचित बहुजन आघाडी
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीचा निर्णय न झाल्यानं आता वंचित बहुजन आघाडी 48 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे मताचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी मतांच्या विभाजनाचा फायदा नेमका कुणाला होणार हे देखील पाहावं लागणार आहे.
काँग्रेसला आणखी एक धक्का, राधाकृष्ण विखे-पाटील राजीनामा देणार?
छोटे पक्ष ठरणार सेना - भाजपची डोकेदुखी?
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपनं युती केली. पण, मित्र पक्षांकडे दुर्लक्ष केल्यानं आता मित्र पक्षांनी देखील भाजपला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला आहे. चार दिवसांपूर्वी राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी भेट घेत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केला होती. पण, आता मात्र राजू शेट्टी यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंधुदुर्गमध्ये देखील शिवसेना – भाजप युती झाल्यानं नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं थेट भाजपला आव्हान देत लोकसभेच्या रिंगणात निलेश राणे यांना उतरवलं आहे. दरम्यान, छोट्या पक्षांनी देखील आता निवडणुकीसाठी तयारी केली आहे. याच पार्श्वभूमिवर काँग्रेस आमदार नितेश राणे महादेव जानकर यांची भेट घेणार आहेत. भाजपकडून सन्मान मिळत नसल्यानं नाराज पक्ष आता एकत्र येत आहेत. परिणामी, आता भाजपवर दबाव वाढवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
VIDEO: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी निश्चित?