मुंबई, 24 जानेवारी: राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. त्यामुळे संसदीय समितीकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाना पटोलेंचा टोला
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानं काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निर्णयावरून जोरदार निशाणा साधला आहे. हा लोकशाही व्यवस्थेविरोधी निर्णय आहे. ललीत मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी हे लाखो रुपये घेऊन विदेशात पळून गेले. त्यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी आवाज उठवला. त्यामुळे राहुल गांधी यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सरकार संविधान संपवण्याचं पाप करत आहे, या घटनेचा निषेध करतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ज्या पद्धतीनं इग्रज आपल्याविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाई करायचे तसेच हे सरकार देखील वागत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
'आवाज दाबण्याचा प्रयत्न'
तर दुसरीकडे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भाजप घाबरलं. त्यामुळे भाजपकडून राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारं हे घराणं आहे. इंद्राजींना देखील अशाच प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा मोठा विजय झाला होता असं थोरात यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, BJP, Congress, Nana Patole, Rahul gandhi