नागपूर, 10 जुलै : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) जलालखेडा येथून विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या तिघांपैकी दोन तरुणांचा नदीत वाहून मृत्यू झाल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे. सचिन शिवाजी कुंभारे (वय - 28) जलालखेडा व विजय सरदार (वय-27) नार सिंगी असे मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे.
जलाल खेडा व नार सिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपूरला पोहचले. आधी अंघोळ करावी व नंतर विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे या मित्रांनी ठरवले. ठरल्याप्रमाणे त्यातील दोघे अंघोळीसाठी नदी पात्रात उतरले.
परंतू नदीला पाणी जास्त असल्यामुळे सचिनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवायला गेलेला विजयसुद्धा पाण्यात बुडू लागला. दोघेही वाहून जात असल्याचे मित्राला दिसले. त्यांनी आरडाओरड केली. काही नागरिक तेथे जमले व लगेच ते नदी पत्रात उतरले. वाहून गेलेल्या सचिन व विजय यांना बाहेर काढले व रुग्णालयात नेण्यात आलं. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे या तिन्ही मित्रांना पोहता येत नव्हते. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेदन गृह पंढरपूर येथे पाठवण्यात आला असून पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहे.
महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू
राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain update) आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashadhi Ekadashi, Nagpur News, Pandharpur