नागपूर, 10, जानेवारी: पोलीस भरतीत डमी उमेदवार प्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलीस भरती (Police Recruitment ) घोटाळ्यात औरंगाबाद कनेक्शन (aurangabad) असल्याचे पुढे आले आहे.
2021 अखेरच्या तीन महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत उमेदवारांकडून 15 ते 17 लाख रुपये घेण्यात आले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्या लेखी आणि शारीरिक परीक्षेला वेगळ्याच उमेदवारांना बसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही टोळी उमेदवाराला पास करून देण्यासाठी बोगस उमेदवाराचा (Fraud Candidate)वापर करत होती.
दरम्यान, या प्रकरणी प्राथमिक अहवालात 8 जनांचा समावेश असल्याचे समोर आले असून आणखी 20 आरोपींचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील एजंट 15 ते 17 लाख रुपये घेऊन अवैध पद्धतीने पोलिसांत भरती करत असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर 100 जणांना अवैधपणे पोलिसांत भरती करण्याचे टार्गेट असल्याचे आढळले आहे.
तसेच, पोलीस विभागासह अन्य इतर शासकीय विभागात अवैधपणे भरती केल्याचे समजले आहे. औरंगाबाद रॅकेटने पुणे, ठाणे,पिंपरी चिंचवड सह अनेक ठिकाणी अशी बनवेगिरी केली आहे.
कोरोनामुळे चेहऱ्यावर मास्क असल्याने खरा उमेदवार ओळखणे अवघड असल्याचा फायदा घेत परीक्षेत डमी उमेदवार बसवण्यात आले होते. राज्यातील इतर भागातही पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्या असण्याची शक्यता असून यात बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra police, Nagpur