नागपूर, 8 फेब्रुवारी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. विधानपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या पक्षीय राजकारणामुळे व्यथित झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला आला वेगळे मिळत असल्याचे दिसत आहे. बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते सुनील केदार हे मैदानात आले आहेत. थोरात यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाव न घेता त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले सुनील केदार -
येत्या 15 तारखेच्या बैठकीत अजेंडा हा आहे की, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांचा सत्कार, भारत जोडोमध्ये सहभागी झालेल्यांचा सत्कार आणि पोटनिवडणुकीची रणनीती ठरविली जाईल. तसेच बाळासाहेब थोरात यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत. थोरात गेल्या अनेक वर्षापासून पक्षात आहेत. ते राजकीय घडामोडींचे साक्षीदार आहे. अनेक लोकं इतर पक्षात गेले. मात्र, थोरात साहेब काँग्रेसमध्येच आहेत. मात्र, जो विषय पुढे येत आहे, ते पक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. पक्ष कुठेतरी मागे होत आहे. पक्षातील कलह पक्षातच सुटला पाहिजे.
10 तारखेच्या बैठकीची माहिती माझ्याकडे नाही. पण कोणी हा पक्ष घरचा समजत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे जर नाना पटोले बोलले असेल तर हा नियम सर्वांनाच लागू होईल. केंद्रातील पक्षश्रेष्ठी हा प्रश्न निकाली काढतील. मात्र, केंद्रातील नेत्यांची गरज पडायला नको. राज्यातील पिढ्यानपिढ्या निष्ठा ठेवणारे नेते हा प्रश्न निकाली काढतील, असा मला विश्वास आहे. आमच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आम्ही सोडवू, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? बाळासाहेब थोरातांचं काँग्रेस हायकमांडला स्फोटक पत्र
2019 मध्ये प्रदेशाध्यक्ष नसताना थोरात साहेबांनी आघाडीमध्ये चांगली मध्यस्थी केली आणि पक्ष मजबूत केला. त्यामुळे थोरात साहेबांचा सन्मान झालाच पाहिजे. तुम्ही कितीही आकाशाला पोहचला तरी, तुम्ही कितीही मोठे झाले असे समजत असाल तरी थोरात साहेबांचा सन्मान केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याशी न बोलता भूमिका मांडणे घातक आहे. विरोधक काँग्रेस पक्षाला संपवायला लागले होते. सुरुंग लावणार होते. मात्र, पक्ष संपला नाही, संपणार नाही, असेही माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदाल म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.