नागपूर, 31 जानेवारी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नागपूर जिल्हातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज वसुली करीता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लीलावामध्ये काढल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांची परिस्थीती ही हालाकिची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली मदत ही फार कमी आहे. दुसरीकडे नागपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान होवूनही अदयापही त्यांची मदत मिळाली नाही. शिवाय नापिकीतून सोयाबीन व कापूस पिकाला त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जे कर्ज घेतले होते ते त्यांना भरता आले नाही. परंतु आता बँकेने कर्ज वसुली करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या शेतीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नागपूर जिल्हात थकीत कर्जाबाबत सुरु असलेल्या लिलावावरील कार्यवाहीस स्थगीती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी पत्राव्दारे देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा : बँकेच्या माजी अध्यक्षाच्या घरी ED सापडलं घबाड, 2 कोटींचे हिरे, 4 आलिशान कार आणि बरंच काही..
बॅनर लावून शेतकऱ्यांची बदनामी
ज्या शेतकऱ्यांवर थकीत कर्ज आहे आणि ज्यांच्या शेतीचा लिलाव होत अश्या शेतकऱ्यांची यादी बॅनरच्या माध्यामातून चौकाचौकात लावण्यात आले आहे. यामुळे आर्थीक अडचण असल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची नाहक बदणामी करण्यात येत आहे. या गंभीर बाबीचा सुध्दा अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Devendra Fadnavis, Nagpur, Nagpur News