नवी दिल्ली, 27 जानेवारी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co operative Bank Election) रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली आहे आणि तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाहीये.
सर्वोच्च न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यासोबतच 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर रहावं लागेल. त्यामुळे नितेश राणे हे 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर होऊन नियमित जामीन अर्ज दाखल करु शकणार आहेत. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे आमदार नितेश राणे यांची बाजू मांडत होते.
वाचा : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडून राष्ट्रध्वजाचा अवमान? पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल
नेमकं काय घडलं न्यायालयात?
नितेश राणेचे वकील मुकुल रोहोतगी यांनी म्हटलं, हा राजकीय कट आहे. आम्हाला वेळ दिला गेला नाही. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पूर्णपणे शिजवलेले प्रकरण आहे. ते विद्यमान आमदार आहे. तक्रारदार ही विरुद्ध पक्षाची व्यक्ती आहे
अभिषेक मनु सिंघवी राज्य सरकारतर्फे बाजू मांडली त्यांनी म्हटलं, तपास बघा, ते तपशीलात गेले आहेत.
सरन्यायाधीश : ठीक आहे मिस्टर सिंघवी, मिस्टर रोहतगी यांना काही म्हणायचे आहे का?
ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी: सगळं शिजलंय. पेपर कटरने साधी दुखापत करण्याचे कारस्थान ते करतात?
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नितश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांना पुढील 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nitesh rane, Sindhudurg, Supreme court