जळगाव, 22 मे : विधान परिषदेवरील (Vidhan Parishad) आमदारांची नियुक्ती राज्यपालांच्या परवानगीसाठी (controversy over MLC Appointment) रखडली आहे. याबाबत आता न्यायालयाने विचारणा केल्यानं आता सरकारमधील नेत्यांनीही यावरून टीका करायला सुरुवात केली आहे. राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी ज्या 12 लोकांची नियुक्ती रखडली आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. राज्यपालांनी याबाबतचा निर्णय लवकर घेतला पाहिजे होता. पण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच आम्हाला माहिती नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
(वाचा-गाव सोडलेली पोरंच संकटकाळात गावासाठी आली धावून; आरोग्य केंद्राला लाखोंची मदत)
मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याला केलेली मदत अशा विषयांवर मतं मांडली. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत न्यायालयाने राज्यपालांच्या मुख्य सचिवांना विचारणा केली आहे. दोन दोन आठवड्यांत त्यावर उत्तर मागवलं आहे. आता ते न्यायालयाला काय उत्तर देतात, याची तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
राज्यपाल नियुक्त आमदार ही काही आजची गोष्ट नाही. ही बाब परंपरागत सुरू आहे. आमदारांच्या मनात विकास आणि राज्याच्या प्रगतीबाबत विविध कल्पना असतात. त्यामुळं आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व दिलं पाहिजे. आपला देश विविध भाषा आणि प्रदेशांत विभागला आहे. म्हणून कोणत्याही विधानसभा क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या जागा रिक्त राहणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
(वाचा-पुण्यात लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांचा डेटा चोरी, राष्ट्रवादीचा भाजपवर आरोप)
पंतप्रधानांवरही टीका
तोक्ते चक्रीवादळामुळं गुजरातप्रमाणं महाराष्ट्रातही मोठं नुकसान नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला मदत केली तशी महाराष्ट्रालाही केली पाहिजे होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात पाहणी दौरा केला. त्यामुळे त्यांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला पण मदतीसाठी प्रयत्न करावेत, असा टोला फडणवीसांना लगावला. केंद्राने मदत करताना राजकारण न करता देशाचा नागरिक म्हणून मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
फडणवीसांचा समाचार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. कोरोना काळ किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी विरोधकांनी कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी करायला नको. अशा कठीण काळात राजकारण बाजूला ठेऊन सूचना केल्या पाहिजे. मार्गदर्शन झालं पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकणात जाऊन मदतीची केलेली घोषणा तपासली तर मुख्यमंत्र्यांनी काय केले हे फडणवीसांच्या लक्षात येईल. मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण व्हीसीवरून काम करत आहेत. ते पण पहिल्यांदा गुजरातला गेले. मुख्यमंत्री जरी घरात असले तरी यंत्रणा बंद आहे का? आम्ही रस्त्यावर नाहीत का? मंत्री रस्त्यावर काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच काम चालत आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.