बीड 8 फेब्रुवारी : हा संपूर्ण जिल्हाच दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे, शेतीसाठी पाण्याची कमतरता असल्यानं उत्पन्न अधिक मिळत नाही आणि परिणामी शेतीतून मिळणाऱ्या नफ्यातही घट होते. मात्र, जिद्द असेल तर काहीही साध्य केलं जाऊ शकतं हे बीडच्या आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. पारंपारिक शेतीपेक्षा (Traditional farming) थोडा वेगळा प्रयोग करून या शेतकऱ्यानं 3 महिन्यातच 7 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे गावातील शेतकरी संजय विधाते यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.
विधाते यांनी पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीची (Bell pepper)शेती करण्यास सुरूवात केली आहे आणि पहिल्याच वर्षी भरगोस उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांसमोरही आदर्श निर्माण केला आहे. नांदूर या गावात कायमस्वरुपी असा पाण्याचा स्त्रोत नाही. पावसाच्या पाण्यावर याठिकाणी कमी कालावधीत येणारीच पिकं घेतली जातात. मात्र, विधाते यांनी माळरानावर रंगीत ढोबळी फुलवत भरगोस उत्पन्नही काढलं. . महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला पाणीही कमी लागत आहे आणि ठिबक सिंचनानं पाणी दिल्यानं पाण्याची बचतही होत आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत आष्टी कृषी विभागामार्फत पॉलिहाऊस उभारण्यासाठी 9 लाखाचं अनुदान मिळालं. याचा फायदा करून घेत रंगीत ढोबळीची लागवड करण्याचा निर्णय विधाते यांनी घेतला. जून महिन्यात 20 गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी 5 हजार 600 लाल आणि पिवळ्या ढोबळी मिरचीची झाडं लावली. आता यातून उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली आहे. यातून केवळ तीन महिन्यात त्यांनी 7 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळवलं आहे. तर, आणखी चार महिने याला मिरची येईल यातून आणखी 8 ते 10 लाखाचं उत्पन्न मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.