मालेगाव, 02 जुलै : मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेचं लोण मालेगावमध्ये देखील पोहोचलं आहे. मालेगाव शहरातील अली अकबर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या आझादनगर भागात मुलं पळवणारी टोळी समजून चार जणांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौघांना जमावाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. अखेर पोलिसांनी जमावाची समजूत काढून त्यांना शांत करून परिस्थितीवर नियंत्रण आणलं. त्यानंतर पोलिसांच्या तावडीत असलेल्या चौघांना ताब्यातही घेतलं.
हेही वाचा
बेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी
चौघेही जण परभणी जिल्ह्यातील असल्याचं समजतंय. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
किडनीसाठी मुलं चोरणारी टोळी गावात आल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात काल 5 जणांची ठेचून हत्या करण्यात आली, याप्रकरणी पोलिसांनी राईनपाडा गावातल्या 23 जणांना अटक केलीये. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
रविवारी संध्याकाळी पोलिसांचं फोरेन्सिक पथकही गावात येऊन गेलं. गावातले बहुतांश पुरुष गाव सोडून गेलेत, त्यामुळे गावात फक्त महिला, वृद्ध आणि लहान मुलं उरली आहेत.
दरम्यान, आमच्याकडे राज्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनचा शिक्का आहे, आम्हाला मारू नका, आम्ही मुलं चोरत नाही, अशी याचना ते 5 जण करत होते, पण त्यांचा जीवच घ्यायचा, असा निर्णय जमावानं घेतला होता, असं प्रत्यक्षदर्शी सखाराम पवार यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.