मुंबई, 10 डिसेंबर: आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा निर्णय शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं. विशेष म्हणजे नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीतीवर खलबतं सुरू असून याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
हेही वाचा......तर चीन आणि पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक करावा, संजय राऊतांचा खोचक टोला
होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय काल (बुधवारी) शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेशानुसार याबाबत निर्णय घेतला जाईल, असं शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
राज्यमंत्री अब्दुव सत्ता यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीनं विजय संपादन केला. त्यामुळे शिवसेनेनं आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
'या' आमदारासाठी शिवसेनेत टाकला गळ!
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी राज्यातील आगामी निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे एकटा पडलेला पक्ष भाजपने देखील महाविकास आघाडीविरुद्ध कंबर कसली आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेत जाऊन मनगटावर शिवबंधन बांधलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पुन्हा पक्षात बोलवण्यासाठी भाजपनं गळ टाकला आहे. मात्र, भाजपच्या गळाला बाळासाहेब सानप पुन्हा लागतात का, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. 2014 मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता. माजी आमदार बाळासाहेब सानप हे 2014 मध्ये नाशिक-पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी भाजपनं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही.
हेही वाचा...रावसाहेब दानवे यांचा DNA तपासावा लागेल, बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी एका मोठा खुलासा केला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पवन पवार याच्यामुळेच आपण निवडून आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे सानप यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे भाजपनं त्यांचं तिकिट कापलं होतं, असंही बोललं जात आहे. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पराभव सामना करावा लागला. सानप यांनी पराभवानंतर राष्ट्रवादीलाही रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. बाळासाहेब सानप यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतलं होतं. आता बाळसाहेब सानप यांना पुन्हा आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.