वाशिम, 11 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला असला तरीही काही भागात मात्र दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दोन घटनांमध्ये अंगावर वीज कोसळून दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे.
नारेगांव शेतशिवारात धीरज दोरक हा 16 वर्षीय मुलगा वडिलांसोबत सोयाबिनची कापणी करत असताना वीज कोसळली. त्यामध्ये धीरज दोरक हा जागीच ठार तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना 3 वाजता दरम्यान घडली. दुसरीकडे, पिंपळगांव गुंजाटे येथील नानासाहेब टोंग हे आपल्या शेतामध्ये सोयाबीन झाकत असताना अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे.
वाशिममधीलच शेंदुर्जना ( मोरे ) येथील उषा रामदास मस्के ( 27 वर्ष ) ही महिला शेतात बकऱ्या चारण्यास गेली असता अंगावर वीज पडून गंभीर जखमी झाली आहे.
अकोल्यातही आईसह मुलं जखमी
शिवारात शेळी मेंढी चारणाऱ्या गुराख्यांच्या ठिय्यावर वीज कोसळून आईसह तीन मुले जखमी झाली आहेत. अकोल्यातील पिंजर अकोला रोडला लागून असलेल्या गजानन पाटील यांच्या शेतात वरील सदाशिव दडस हे आपल्या परीवारासह शेळी मेंढी घेऊन राहतात. आज दुपारनंतर अचानक विजांचा कडकडाट होऊन पाऊस सुरु झाला.
यावेळी हे कुटुंब आपल्या झोपडीजवळ लोखंडी बाजीवर बसलेले असताना अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत आईसह एक मुलगा आणि दोन मुली जखमी झाल्या. यातील दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.