शिर्डी, 12 नोव्हेंबर: महाराष्ट्र सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे. 2018 साली गाळप केलेल्या ऊसाचे कोट्यावधी रूपये थकवल्याने शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.
ऐन दिवाळीत उपाशीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे प्रसाद साखर कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा..जयंत पाटलांनी जे फुकट मिळालं ते हजम करावं, चंद्रकांतदादांचा सणसणीत टोला
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात असलेल्या प्रसाद साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे.. 2018 साली साखर कारखान्याने 2321 रूपये प्रतीटन भाव जाहीर केला आणी राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादकांना त्यानुसार पैसेही अदा केले मात्र नेवासा आणी श्रीरामपूर तालुक्यातील हजारो शेतकर्यांना केवळ 2100 रूपयांप्रमाणे पैसे दिले गेले. आज देऊ उद्या देऊ.. अशी केवळ आश्वासने दिली गेली.
गेल्या वर्षी तर गळीत हंगामही बंद होता यावर्षी मात्र गळीत हंगामाची सुरूवात झाली आहे.. आमचे थकीत पैसे द्या, ही मागणी करत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी गुरूवारी प्रसाद साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 221 रूपयांप्रमाणे हजारो शेतकऱ्यांचे जवळपास सव्वा दोन कोटी रूपये शेतकऱ्यांना घेणं आहे. मात्र, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. साखर संचालकांनी गेल्या वर्षी साखर कारखान्याला पैसे अदा करण्याचे आदेश दिलेले असताना प्रसासनाने त्याकडेही डोळेझाक केली आहे.
हेही वाचा...'गाणं म्हणणे आणि विधानं करणे, यात रश्मी ठाकरे कधी पडल्या नाही'
आता तर प्राजक्त तनपूरे सत्तेत असल्याने कोणासही दाद देत नसल्याचं चित्र आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकरी उपाशीपोटी आपल्या पैशाची मागणी करत कारखान्याच्या गेटसमोर बसले आहेत. आमचे पैसे दिले जात नाही तोवर आम्ही उठणार नाही, असा पवित्रा ऊस उत्पादक शेतकरी आंदोलकांनी घेतला आहे.. यामुळे ऐन दिवाळीला कारखानदार तुपाशी आणी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असल्याचं शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.