कोल्हापूर, 18 जानेवारी : राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला असून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे.
हातकणंगले तालुक्यातील पाडळी गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हाती आला आहे. यामध्ये आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलचा विजय झाला आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. आता गावाचा गाडा नेमका कोण हाकणार याचा फैसला पुढच्या काही तासात लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी श्वास रोखले आहे.
महाराष्ट्रात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्यानं आज 12 हजार 711 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी करण्यात येणार आहे. गावपातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat