कुंदन जाधव, प्रतिनिधी
अकोला, 22 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोर बैठका सुरू आहे. सत्तेसाठी महाविकासआघाडी तयार होत आहे. परंतु, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असा टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. गेल्या 26 दिवसांपासून राज्यात नाटक सुरू आहे. राष्ट्रवादी हा पक्ष बिनबुडाचा आहे. तो कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. काँग्रेसनेही शिवसेनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्रिपदासाठी पुढाकार घेतलेल्या शिवसेनेचा पोपट होऊ नये म्हणजे झालं, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
लोकांमध्ये चीड निर्माण व्हावी असं सध्या राज्यात वातावरण आहे, 370 रद्द होणार ही कुठेही चर्चा नव्हती ते ताबडतोब करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्राचा डाव असून वेगळा विदर्भ करण्याची केंद्राची भूमिका असल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी मदत जाहीर केली होती
राज्यपाल त्याची अंमलबजावणी करणार का? केंद्रसरकार याबाबत राज्यपालाना निर्देश देईल का? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थितीत केला.
उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री?
दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकासआघाडी सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी नेतृत्त्व करावं यावर आमची सहमती झाली आहे, असं स्पष्ट केलं आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी यावर अजून होकार कळवलेला नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजून चर्चा सुरू राहणार आहे, लवकरच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं.
=========================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा