मुंबई, 03 मार्च : मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यातच राज्यातील (Coronavirus in Maharashtra Latest Update) कोरोनानं पुन्हा रौद्र रूप धारण केलं आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या वर्षातील सर्वाधिक 8 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती आणि आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 9 हजारांच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे गेले काही दिवस मुंबई, पुण्याहून कोरोना विदर्भाकडे कूच करत असताना आता अचानक त्याने पुन्हा मुंबई-पुण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबई-पुण्याचा (Covid-19 Cases in Pune and Mumbai) कोरोनाचा धोका पुन्हा सर्वात जास्त वाढला आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिवसभरात तब्बल 9,855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेले काही दिवस हा आकडा 8 हजारांमध्ये होता. त्यामुळे आता राज्याची चिंता वाढली आहे. सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे ती पुणे आणि मुंबईत. पुण्यात दिवसभरात 853 तर मुंबईत 1121 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दरही वाढला आहे. मागच्या आठवड्यात 0.28 टक्के असलेला दर या आठवड्यात 0.29 इतका झाला आहे.
राज्यातील 03 मार्चची कोरोना रुग्णांची आकडेवारी (Maharashtra total Covid 19 Cases)
एकूण रुग्ण - 21,79,185
उपचार घेत असलेले रुग्ण - 82,343
दिवसभरातील नवे रुग्ण - 9,855
दिवसभरात बरे झालेले रुग्ण - 6,559
एकूण बरे झालेले रुग्ण - 20,43,349
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 93.77%
दिवसभरातील मृत्यू - 42
मृत्यूचं प्रमाण - 2.40%
हे वाचा - मोठी बातमी : पुण्यातील 42 ठिकाणी निर्बंध, सोसायट्यांसाठी असे असतील नवे नियम
या दोन्ही भागात कोरोना पुन्हा वेगानं हातपाय पसरू लागला आहे. (New Hotspot in Pune) ही परिस्थिती पाहता आता पुणे महापालिकेकडून रुग्णांचे प्रमाण अधिक असलेले 42 भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र’ (Pune Micro Containment Zone List) घोषित करण्यात आले आहेत. दर 15 दिवसांनी त्याचा फेरआढावा घेतला जाईल आणि पुनर्रचना केली जाईल. प्रशासकीय पातळीवर अधिक खबरदारी बाळगण्यात येत आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असून शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
हे वाचा - Covaxin च्या अंतिम ट्रायलचा अहवाल जारी; लसीकरण सुरू असतानाच समोर आली मोठी माहिती
राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारही धडपड करतं आहेत. सरकारनं जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्याच्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाप्रभावित जिल्ह्यांमध्ये आरटी-पीआर आणि रॅपिड अँटिजेन दोन्ही टेस्ट कराव्यात. लक्षणं असलेल्या ज्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करावी, असं सांगितलं आहे. तसंच आता 24 तास लसीकरण होणार आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या सोयीनुसार लस घेता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना लस मिळेल.